पवन होन्याळकर
मुंबई : दहावीची पायरी ओलांडताच राज्यातील १५.५० लाख विद्यार्थ्यांच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. कुणी अकरावीची वाट धरली, कुणी पॉलिटेक्निक निवडले, तर कुणी आयटीआयची निवड केली. अशाप्रकारे राज्यातील सुमारे २.३५ लाख विद्यार्थी कौशल्य आणि तंत्रशिक्षणाच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. तथापि, अकरावीला संख्या जास्त असली तरी केवळ ६० टक्के जागा भरल्या आहेत. दुसरीकडे पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्यांची टक्केवारी ८२.३३, तर आयटीआयला प्रवेश घेणाऱ्यांचा टक्का ८२.१३ इतका आहे. म्हणजेच कौशल्य आणि तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसतो.
दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गेल्या तीन महिन्यांत प्रवेशाची धावपळ सुरू होती. ‘कनिष्ठ महाविद्यालय की कौशल्याचे शिक्षण?’ या प्रश्नाचे उत्तर राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या आकडेवारीतून दिले आहे. अकरावीच्या वर्गात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असला, तरी उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशाचे प्रमाण केवळ ६०.२६ टक्के आहे. दुसरीकडे आयटीआयमध्ये ८१ टक्के, तर पॉलिटेक्निकमध्ये तब्बल ८२.३३ टक्के जागा भरल्या आहेत. त्यामुळे दहावीनंतर पारंपरिक अकरावीबरोबरच तांत्रिक आणि कौशल्याधारित शिक्षणालाही विद्यार्थ्यांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे यंदाच्या प्रवेशाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यात यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या १४ लाख २० हजार ४८६ नियमित विद्यार्थ्यांसह रिपीटर आणि इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या १५ लाखांहून अधिक होती. यापैकी तांत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात पॉलिटेक्निकने यंदा लक्ष वेधून घेतले आहे. राज्यातील ४४९ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये १ लाख ३९ हजार १४७ जागा उपलब्ध होत्या. या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील १ लाख ४० हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यापैकी १ लाख १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तीन शाखांमध्ये तब्बल ५७ हजार १५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या तीन शाखांच्या प्रवेशात ४ हजार ९४० विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. पॉलिटेक्निकपाठोपाठ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडेही विद्यार्थ्यांचा चांगला ओघ राहिला आहे. राज्यात १,००४ आयटीआय संस्थांमध्ये १ लाख ४९ हजार ५२३ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी २ लाख ३६ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख ६ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले, तर २ लाख २ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. पर्याय अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५२ हजार ३१३ होती. शनिवारपर्यंत १ लाख २२ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.