अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या विशेष फेरीत 85 हजार विद्यार्थ्यांना संधी  file photo
मुंबई

11th admission : अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या विशेष फेरीत 85 हजार विद्यार्थ्यांना संधी

राज्यात दिवसभरात 18 हजार 845 विद्यार्थांचे प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ओपन टू ऑल’ च्या दुसर्‍या विशेष फेरीअंतर्गत राज्यभरातून 85 हजार 101 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 22 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्षात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यामध्ये मंगळवारी दिवसभरात राज्यात 18 हजार 845 विद्यार्थांनी प्रवेश घेतला असून, मुंबई विभागातून 2 हजार 142 विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला.

यंदा राज्यात प्रथमच इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 11 ऑगस्टपासून प्रत्यक्ष महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण 9 हजार 528 कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता 21 लाख 54 हजार 692 इतकी आहे. या जागांसाठी आतापर्यंत 14 लाख 71 हजार 747 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, त्यातील 12 लाख 22 हजार 250 विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतले आहेत.

‘ओपन टू ऑल’ अंतर्गत राबविण्यात येणार्‍या दुसर्‍या विशेष फेरीची निवड यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीत 85 हजार 101 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये प्राधान्यक्रमानुसार कला शाखेसाठी 23 हजार 961, वाणिज्य शाखेसाठी 24 हजार 145 आणि विज्ञान शाखेसाठी 36 हजार 995 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 19 ते 22 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी 18 हजार 845 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये नियमित फेरीमध्ये एकूण 18 हजार 82 इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत 763 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT