लातूर; पुढारी वृतसेवा : शहर व जिल्ह्यातील कांही भागात बुधवारी पाऊस झाला. लातूर शहरात सायंकाळी विजांच्या कडकडात व
ढगांच्या गडगडात पावसाने हजेरी लावली. निलंगा तालुक्यातील काही गावांत वादळासह गारा पडल्या. लातूर शहरात सायंकाळी
आकाश काळ्या ढगांनी गच्च झाले होते. पावनेपाच वाजेच्या सुमारास वीजांच्या प्रचंड कडकडाट सुरू झाला तो तब्बल अर्धा तास सुरू होता. या दरम्याम वारे व पाऊस झाला. दरम्यान गेल्या आठवड्यापासून अधून मधून होत असलेल्या पावसाने जलस्त्रोतांना चांगले पाणी आले आहे.
मांजरा धरण 60 टक्के भरले असल्याने लातूर शहराचा पाणीपुरवठ्याबाबत आता फारशी काळजी राहीली नाही. विशेष
म्हणजे लघू व मध्यम प्रकल्पांनी चांगला पाणीसाठा झाल्याने सिंचनाला अनुकूलता लाभली असून रब्बीसाठी हा जलसंचय पुरक व पोषक ठरणार आहे यामुळे गुरांच्या पाण्याच्या प्रश्नही मार्गी लागणार आहे. रेणापूर शहरासह पानगाव परिसारातही पाऊस झाला. अहमदपूर व औसा तालुक्यात हलका पाऊस झाला. देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात मध्यम स्वरुपात पाऊस झाला
निटूर : निलंगा तालूक्यातील निटूरसह शेंद, मसलगा, ताजपूर, मुगाव, केळगाव, कलांडी आदी गावांना जोराचा वारा वीजांचा कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसाने अर्धा तास झोडपले. त्यामुळे गावे व शेत शिवारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी गाराही
पडल्या कलांडी येथे वीज कोसळून व्यंकट राम सूर्यवंशी यांचा बैल ठार झाला. लांबोटा येथील उषाबाई लक्ष्मण औटी (वय 45) शेतात म्हैस चारताना वीज पडून मृत्यू पावल्या तर म्हैसही दगावली आहे.