मुंबई; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा रंगली होती. पण प्रीतम मुंडे यांच्याऐवजी कै. गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी डॉ. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांना शह देण्याच्या हेतूने ओबीसी म्हणून डॉ. कराडांना संधी दिल्याचेही बोलले जाते. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
"आम्ही नाराज नाही. होणाऱ्या चर्चांना विराम द्यावा", असं स्पष्टीकरणं पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.
"नियुक्त झालेल्या मंत्र्यांना शुभेच्छा देते. मी नाराज असण्याचं कारण नाही. मला अभिनंदनांचं ट्विट करावसं वाटलं नाही. मुंडे साहेबांमुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रीपद मिळावं, अशी लोकांच्या अपेक्षा असतात. लोकांशी असलेलं नातं कधीच तुटत नाही. पक्षश्रेष्ठींनी नव्या लोकांना संधी दिली, त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्यामुळे होणाऱ्या चर्चांना विराम द्यावा", असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
"मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. वंजारी समाजातील कोणताही नेता असला मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. प्रीतम मुंडे यांना पद मिळालं नाही म्हणून नाराज नाही. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे", असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
"आम्ही केलेले कष्ट हे पक्षासाठीच केलेले आहेत. मी खूप भाग्यवान आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. महाराष्ट्राचा नेता असतो. तो कोणत्या जातीचा नेता नसतो. त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलण योग्य नाही.
आम्ही दोघींना कधीही मंत्री पदाची मागणी केलेली नाही. त्यामुळे नव्याने मंत्रीपद मिळणाऱ्या नेत्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत", अस मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नाशिक महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस शहरात गेले असता पत्रकारांनी त्यांना मुंडे भगिनींसंबंधी प्रश्न विचारला.
त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला, "मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं? त्या नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. पक्षातील निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात", असे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
शिवसेना काय म्हणते?
श्री भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले. पण, प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे", असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हंटलं आहे.