मराठवाडा

औरंगाबाद : उद्धव ठाकरेंकडे पालकमंत्री, जिल्हाप्रमुखांच्या एकाधिकारशाहीची तक्रार

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील काही बंडखोर आमदारांकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह वरिष्ठ नेत्यांना संपर्क केला जात आहे. जिल्ह्यातील काही आमदारांनीही अशा प्रकारे संपर्क केला असून त्यात त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुखांच्या एकाधिकारशाहीची तक्रार केली असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक पाच आमदार आहेत. चार दिवसांपासून हे सर्व जण गुवाहाटीत आहेत. त्यातील काही जणांकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही आमदारांनीही अशा पद्धतीने संपर्क केला आहे. त्यात त्यांनी आपल्या बंडखोरीमागील कारणे नमूद केली आहेत. महापालिका प्रभाग रचनेतील उलथापालथी, पालकमंत्र्यांनी संघटनेऐवजी प्रशासकीय बाबींकडे दिलेले लक्ष, एक दोन लोकप्रतिनिधींनाच महत्व देणे, 8 जूनच्या सभेत आ. संजय शिरसाट यांना भाषण न करून देणे, आ. प्रदीप जैस्वाल यांनी प्रभाग रचनेबाबत केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेणे आदि मुद्दे बंडखोरांकडून पुढे करण्यात आले आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना वैजापूरचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांचा फोन आला होता. त्यातही आ. बोरणारे यांच्यासह इतरांनीही जिल्हाप्रमुखांच्या एकाधिकारशाहीला कंटाळल्याचा सूर लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सुभाष देसाई यांनी पालकमंत्रीपदाचा पदभार घेतल्यापासून ते अधिकाऱ्यासारखे वागतात. संघटनेकडे त्यांनी लक्ष दिले नाही, त्याऐवजी प्रशासकीय बाबींवर लक्ष दिले, केवळ एक दोन लोकप्रतिनिधींनाच मदत केली इतरांकडे दुर्लक्ष केले असा दावाही बंडखोरांच्यावतीने करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT