जालना; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे एकाच कुटुंबातील सात वर्षाच्या मुलीसह सहा जणांना अन्नातून विषबाधा झाली. कुटुंबातील सर्वांवर वडीगोद्री येथे उपचार सुरू आहेत.
नवरात्र महोत्सव सुरू झाल्याने नऊ दिवस उपवास धरण्याची भक्तांमध्ये परंपरा आहे. त्यात आज (दि.७) पहिली माळ होती. अंतरवाली सराटी येथील कांताबाई एकनाथ तारख (वय ५५), महादेव एकनाथ तारख (वय ३४), जगन्नाथ एकनाथ तारख (वय. २७), ज्योती महादेव तारख (वय ३०), सिमा जगान्नाथ तारख (वत्र 22), ज्ञानेश्वरी जगन्नाथ तारख (वय ७ वर्षे) यांनी सकाळी ११ वाजता उपवास असल्याने उपवासाला शाबुदाण्याची खिचडी खाऊन शेतात काम करायला गेले.
यानंतर आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सर्वांना मळमळ, उलटी, थरकाप, तसेच थंडी वाजून येऊ त्रास होऊ लागला. पुढे सर्वांना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ज्योती तारख यांची प्रकृती खालवल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचासाराठी हलविले आहे.