परभणी जिल्ह्यात तापणार 'ग्राम'राजकारण File Photo
परभणी

परभणी जिल्ह्यात तापणार 'ग्राम'राजकारण

५६९ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

पुढारी वृत्तसेवा

'Village' politics will heat up in Parbhani district

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तब्बल ५६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू झाली असून, ग्रामविकास विभागाने मंगळवारी (दि.१७) प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जिल्ह्यातील ५६९ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक १०१ ग्रामपंचायती जिंतूर तालुक्यात, तर ८८ परभणी तालुक्यात आहेत. गंगाखेड (७१), सेलू (६७), पूर्णा (६५), पालम (५३), पाथरी (४२), मानवत व सोनपेठ (प्रत्येकी ४१) या तालुक्यांतील ग्रामपंचायतींचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. या आकडेव ारीवरूनच ग्रामीण भागातील राजकीय ताकदीचे केंद्रबिंदू स्पष्ट होत असून, प्रमुख पक्षांसह स्थानिक आघाड्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रभाग रचना हा अत्यंत संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक टप्पा मानला जातो. प्रभागांच्या सीमांकनावर स्थानिक गटबाजी, जातीय व भौगोलिक समीकरणाचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे या प्रक्रियेकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास मंत्रालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर केला आहे.

तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मार्च अखेरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. एप्रिलमध्ये हरकती व सूचनांची प्रक्रिया पार पडणार असून, ४ मे रोजी अंतिम मान्यता दिली जाणार आहे. ७ एप्रिलपर्यंत प्रारूप रचनेची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार असून, १३ एप्रिलपर्यंत हरकती मागवण्यात येणार आहेत. २१ एप्रिलपर्यंत सुनावणी होऊन २८ एप्रिलला अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक ग्रामीण सत्ता संघर्षाची रंगीत तालीम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत हीच पुढील पाच वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची रंगीत तालीम ठरते. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. स्थानिक नेते, माजी सरपंच, युवा कार्यकर्ते यांच्यात हालचाली सुरू झाल्या असून, गावपातळीवरील समीकरणे नव्याने आखली जात आहेत.

या काळात स्थानिकपातळीवर तक्रारी, आक्षेप आणि राजकीय दबाव वाढण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी प्रभागांची रचना विशिष्ट गटांना पोषक ठरेल का, यावरून वाद निर्माण होऊ शकतात. एकूणच ५६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात नव्या संघर्षाची नांदी होणार आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी काही महिने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार, हे मात्र तेवढेच निश्चित मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT