सेलू : अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने सेलू व जिंतूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे. याबातचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू येथे देण्यात आले.
शनिवारी मध्यरात्री व रविवारी सेलू जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले. सेलू, जिंतूर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जमीन खरडून गेली आहे. वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही भागात पुराच्या पाण्यामुळे जनावरे, शेतातील कडब्याची गंजी वाहून गेले आहेत. अनेक भागात विहिरींचे नुकसान झाले. सेलू तालुक्यासह शहरातील सखल भागात घरामधे पाणी शिरून संसारउपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेती भागातील पाझर तलाव फुटले आहेत. शेतीभागातील पाण्याच्या मोटारी, शेतीपंप, सोलारपंप, मोटारसायकल वाहून गेल्या आहेत.
गेल्यावर्षी सेलू तालुका पिकविम्यातून पूर्णपणे वगळण्यात आला होता व जिंतूर तालुक्यातील काही मंडळे वगळण्यात आली होती. अशा मंडळांना अनुदान देण्यात यावे व पीक विमा देण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, पीकविमा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावा, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या मागण्यांचे निवेदन सेलू जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सेलू उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी समवेत अशोक नाना काकडे, पुरुषोत्तम पावडे, अप्पासाहेब डख, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, जीवन आवटे, पप्पू गाडेकर, आनंद डोईफोडे, रघुनाथ बागल, विठ्ठल काळबांडे, बालासाहेब रोडगे, विठ्ठलराव ताठे, शेख दिलावर, राजू सोळंके, नथुराम अंभुरे, अमोल जाधव, परवेज सौदागर, अॅड. दत्तराव श्रावणे, शुभम कदम, सचिन शिंदे, गुड्डू भाई, लालाभाई, उदय रोडगे, नवनाथ खांडेकर, किशोर भांडवले, भागवत बालटकर, अशोक थोरात, राजू मगर, वैभव वैद्य, अक्षय दिग्रसकर, नीयाज भाई, बापू बाविसे, सचिन कदम, वैभव निकाळजे, भगवान कदम, पंकज चव्हाण, राजकिशोर जैस्वाल, तुकाराम मगर, सुनील जोगदंड, शेख मुख्तार, शेख हुसेन, तोफीक भाई, बबलू ताठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.