आनंद ढोणे
पूर्णा : शहर व तालुका परिसरातील काही भागात सोमवारी (दि .२३ फेब्रुवारी) दुपारी ३:३० वाजे दरम्यान अचानक अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून हवामानात बदल होवून ढगाळ वातावरण तयार झाले. त्याचे रुपांतर सोमवारी दुपारनंतर वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. अजूनही अकाशात ढगाळ वातावरण कायम असून रात्रीच्या वेळी जोरदार अवकाळी पाऊस पडण्याचे चिन्हं दिसून येत आहे.
अवकाळी पावसाचे सावट दिसू लागल्याने रब्बी हंगाम धोक्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच विहीर बोअरवेल्स या सिंचन साधनांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने औंदा मोठ्या क्षेत्रावर रब्बी हंगामात गव्हू, हरबरा ज्वारी भाजीपाला, करडई या पिकांची लागवड झाली. हिवाळ्यात थंडीचे वातावरण पिकांना पोषक राहील्यामुळे रब्बीतील सर्वच पिकं जोमदार आली आहेत.
सध्या काही ठिकाणी अबक पेरणीचा गव्हू, हरबरा ज्वारी पीक परिपक्व होवून काढणीस आलेत तर त्या मागील पेरणीचे शुध्दा पिके डौलाने उभी आहेत. मात्र यातच, अतिवृष्टीमुळे खरीप गेला असता शेतकऱ्यांची मदार आशा रब्बी पिकावर असताना आता तेही निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या घडीला आकाशात नभ दाटून येत असल्याने रग्गड आलेलं रब्बी पीक अवकाळी वादळीवारा आणि पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा वाया जातो की काय? अशी भिती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
सोमवारी एकदाचा साधारण वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडून जरी थांबला असला तरी आकाशाकडे पाहिले असता अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे शेतात उभे असलेल्या रब्बी पिकाकडे पाहून शेतकऱ्यांचा जीव कासावीस होताना दिसून येत आहे.दरम्यान,हे नैसर्गिक संकट देवाने निसतारुन न्यावे,अशी निसर्गराजाकडे शेतकरी प्रार्थना करु लागलाय. सध्या असी जरी परिस्थिती निर्माण झाली असता तरी "आपल्या हातात फक्त पिकवायचे आहे बाकी काहीच नाही."आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे काही चालेना "या म्हणीचा प्रत्यय येत आहे.