The percentage of girls is higher than boys in the 12th result.
परभणी, पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेत गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालात वाढ झाली. गतवर्षी सर्व विद्या शाखांचा निकाल ८६.३३ टक्के इतका होता मात्र यावर्षी तो ८७.६९ टक्क्यांवर आल्याने १.३६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली.
छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्हयांमध्ये जिल्ह्याचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून यावर्षीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक असल्याने मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र समोर आले. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.५३ टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा ८६.७० तर कला शाखेचा निकाल ७५.६२ टक्के राहिला.
बारावीच्या परीक्षेचा निकाल
शनिवारी (दि.२) दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. जिल्हयात जिंतूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३.११ टक्के इतका आला. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान अशा शाखांसाठी २६ हजार ९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २५ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २२ हजार ४३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८७.६९ टक्के इतके आहे. नियमीत विद्यार्थ्यांमध्ये अर्ज दाखल केलेल्या १४ हजार ३३६ मुलांपैकी १४ हजार ७३ मुलांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
त्यातील ११ हजार ८०२ मुले उत्तीर्ण झाले आहेत. नियमित ११ हजार ७५८ अर्ज दाखल केलेल्या मुलींपैकी ११ हजार ५११ मुलींनी परीक्षा दिली असून त्यातील १० हजार ६३५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण २२ हजार ४३७ मुले व मुली उत्तीर्ण झाले असून त्यांची ही टक्के वारी ८७.६९ इतकी आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास ऑनलाईन केंद्रांवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तर अनेक सुज्ञ पालक व विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईलवरच निकाल जाणून घेतल्याचे दिसले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला आहे. बारावीसाठी ११ हजार ७५८ मुलींनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ११ हजार ५११ मुलींनी परिक्षा दिली त्यातून १० हजार ६३५ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे हे प्रमाण ९२.३८ टक्के इतके आहे. मुलांमध्ये १४ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात १४ हजार ७३ मुले परिक्षेला सामोरे गेली त्यातून ११ हजार ८०२ उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची ही टक्केवारी ८३.८६ टक्के इतकी आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती वैशाली पंकज आंबेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माधूर, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरंगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.