पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज (दि. २३) ताडकळस टी पॉईंट मुख्य रोडवर रास्ता रोको करुन ठिय्या आंदोलन केले. यामुळे मार्गावर तिहेरी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात धनगड जमात अस्तित्त्वात नसून त्या ऐवजी धनगर समाज आहेत, असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्चन्यायालयात दिले आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा, मुंबई उच्च न्यायालयात धनगर एसटी आरक्षणाची केस सुरु होती. त्यामध्ये धनगड अस्तित्त्वात नाहीत, असे राज्य सरकारने शपथपत्र दिले होते. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील खिलारे नावाच्या धनगर बांधवांनी धनगडाचे बनावट दाखले काढल्याने धनगडाची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली. म्हणून राज्य सरकारने तत्काळ धनगडाचे दाखले रद्द करावे, धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जीआर राज्य सरकारने तत्काळ काढवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्रातील जिल्हाधिका-यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्त्वात नसून अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी धनगर, असे गृहित धरुन धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे दाखले वितरीत करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांना देण्यात आले.
याप्रसंगी, सकल धनगर समाजाच्या सहभागी कार्यकर्त्यांनी सरकार विरुध्द जोरदार घोषणा देत एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा आगामी काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा दिला. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.