ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळससह गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांत दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी आणि परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली.
आ. डॉ. गुट्टे यांनी ताडकळस येथे शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. पात्र शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व शासनाची आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
उभी खरीप पिके वाचविण्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी बी-६८ कालव्यातून तातडीने सोडावे, अशी मागणी त्यांनी जलसंपदा विभागाकडे केली. परिसरातील पिकांसह पशुधनासाठी निर्माण झालेला पाण्याचा प्रश्नही तातडीने सोडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य दिलीप आंबोरे, मनु पाटील आंबोरे, मारोती मोहिते, खंडेराव वावरे, कन्हैया धुळगुंडे, नरहारी रुद्रवार, मदनराव आंबोरे, माऊली रुद्रवार, नवनाथ होणमने, पवन मोहिते, जगन्नाथ वडजे यांच्यासह गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.