Purna Heavy Rain flood inspection Makarand Patil
पूर्णा : राज्यातील अतिवृष्टी व नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. काहींच्या शेतीजमिनी वाहून गेल्या, जनावरे मृत्युमुखी पडली, तर अनेकांचे घरे, दुकाने व मानवी जीवितहानीही झाली आहे.
अहमदनगर, सोलापूर, बुलडाणा, वाशीम यांसह राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील नुकसान सर्वाधिक असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे मंत्री पाटील यांनी आज (दि. २५) पुरग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शक्य तेवढी अधिक मदत शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न सरकार करेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री सध्या विविध ठिकाणी पाहणी दौरे करत आहेत. त्यानंतर कॅबिनेट बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल.”
धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रासह लिमला गावातही त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी केली.
या प्रसंगी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे, तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.