डॉ. सचिन चिद्रवार
मानवत : येत्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मानवत तालुक्यातील असलेल्या कोल्हा, ताडबोरगाव, केकरजवळा व रामपुरी बु. या 4 गटासाठी 21 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बहुरंगी चारही गटात लढती रंगणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हा या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटामध्ये पंचरंगी मुकाबला होत आहे. भाजपच्या वतीने परमेश्वर पंढरीनाथ निर्वळ, शिवसेनेच्या वतीने गंगाधर काशिनाथ पितळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुकुंद नानासाहेब मगर, शिवसेना उबाठाच्यावतीने मीरा विष्णू मांडे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कैलास महादेव काळे हे रिंगणात आहेत. याठिकाणी एकही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात नाही.
ताडबोरगाव या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटांमध्ये 6 उमेदवारांमध्ये सामना रंगला आहे. यामध्ये बाजार समितीचे सभापती पंकज जाधव यांच्या पत्नी वैशाली पंकज जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस कडून, संतोष गणपत जाधव शिवसेनेकडून, माधव बंसीधर काकडे हे मनसेकडून, वसंत प्रल्हाद जोगदंड शिवसेना उबाठा कडून, हरिभाऊ दत्तात्रय निर्मळ हे भाजप कडून गन्नी रहेमान शेख हे अपक्ष उमेदवार ऑटोरीक्षा घेऊन मैदानात उतरले आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेल्या केकरजवळा या जिल्हा परिषद गटामध्ये 6 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागीरथी रावसाहेब लाडाने, शिवसेनेकडून कौशल्या तुकाराम शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून पूजा विष्णू हारके, भारतीय जनता पक्षाकडून सिंधू बालासाहेब होगे, वंचित आघाडी कडून शिला तुकाराम भारती तर कंगवा हे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार सोनू बाळू काळे प्रचारात रंगले आहेत. सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असलेल्या रामपुरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून गीतांजली दत्तात्रय जाधव, शिवसेनेकडून प्रतिमा विशाल यादव, भाजपच्या वतीने वनिता सुरेश यादव, वंचित आघाडीच्या वतीने सविता दत्ता राऊत या चार जणांत तगडी फाईट होत आहे.
चार गटात 53 गावाचा समावेश, 70669 मतदार
कोल्हा जिल्हा परिषद गटात तालुक्यातील पंधरा गावाचा समावेश असून 18590 मतदार आहेत. ताडबोरगाव गटामध्ये 13 गावाचा समावेश असून 17654 मतदार आहेत. केकरजवळा गटात 10 गावाचा समावेश असून 16667 मतदार आहेत. रामपुरी बु या गटात 15 गावाचा समावेश असून 17758 मतदार आहेत. सध्या चारही गटात प्रचार शिगेला पोहचला असून गावे गावे फिरताना मात्र उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.