चारठाणा : पुढारी वृत्तसेवा
जिंतूर तालुक्यातील एक (२८ वर्षीय) महिला मागच्या आठ दिवसांपासून तिच्या तीन मुलींसह बेपत्ता झाली आहे. संबंधित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद घेण्यात आली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील एक विवाहित महिला तिच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने चिंतेत होती. त्यातच पतीच्या दारू पिण्यामुळे दोघा पती-पत्नीमध्ये वाद होत होते. सदरील महिला २७ जून रोजी त्याच्या जिंतूर तालुक्यातील राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता तिच्या तीन मुलींसह बेपत्ता झाली आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर संबंधित महिलेच्या पतीने पत्नी व तिन्ही मुलींच्या नातेवाईकांकडे व अन्य ठिकाणी शोध घेतला. परंतु त्या मिळून न आल्याने संबंधित महिलेच्या पतीने चारठाणा पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दिली. त्यावरून मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वसंत वाघमारे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.