गंगाखेड : गंगाखेड–परळी महामार्गावरील रखडलेल्या व अपूर्ण कामामुळे पुन्हा एकदा निष्पापांचे बळी गेले आहेत. सोनपेठ तालुक्यातील निळा पाटी परिसरात पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वळण रस्त्याची योग्य सूचना नसल्याने कारचा भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 14 जानेवारी) रात्री घडली.
परळीहून गंगाखेडकडे येत असताना एम एच 44एस6285 ही कार निळा पाटी जवळ पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. रात्रीच्या वेळेस कोणतीही दिशा दर्शविणारी सूचना, फलक अथवा प्रकाशव्यवस्था नसल्याने चालकाला वळण रस्ता लक्षात आला नाही. अचानक ब्रेक मारल्याने कारचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर कार आदळली.या अपघातात चालक गणेश जगन्नाथ दुलेवाड (वय 40, व्यवसाय – शिक्षक, दाबी तांडा ता. परळी; मूळ रा. बहादरपुरा ता. कंधार जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात स्टेअरिंग छातीतील बरगड्यांमध्ये घुसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
कारमध्ये सोबत असलेले राज राम ईश्वर (वय 28, रा. अभवरवास, ता. व जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिका चालक हनुमान इंगळे व रावण भालेराव यांनी त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पाच वर्षांपासून रखडलेला महामार्ग ठरत आहे मृत्यूचा सापळा
गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या गंगाखेड–परळी महामार्गाच्या कामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप वाहनधारकांतून होत आहे. अवघ्या 30 किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी पुलांची कामे अपूर्ण असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून तसेच ठेवण्यात आला आहे. कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने सतत अपघात घडत आहेत.अपघातांची मालिका सुरू असतानाही महामार्ग प्रशासनाची गंभीर उदासीनता दिसून येत आहे. धोकादायक ठिकाणी तात्काळ सूचना फलक, प्रकाश व्यवस्था व पर्यायी मार्गाची स्पष्ट चिन्हे लावावीत तसेच रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.