Monsoon Water Crisis Parbhani
पूर्णा : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील अण्णाभाऊ साठे चौक आणि परिसरात भर पावसाळ्यातही पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी, आंघोळ, भांडी आणि कपडे धुण्यासाठी महिलांना दूरवरून डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महादेव मंदिर, मराठा गल्ली तसेच परिसरातील खासगी बोअरवेलवर पाण्यासाठी नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे.
पालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांना घरातील अन्य कामे बाजूला ठेवून पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले.
प्रभागातील काही घरांमध्ये खासगी बोअरवेल असल्याने त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी नागरिकांना जावे लागते. काही वेळा घरमालकांकडे विनंती करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. सांडपाण्यासाठीही लांब पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याची व्यथा महिलांनी व्यक्त केली.
"पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, या मागणीसाठी आम्ही अनेक वेळा पालिकेत गेलो. मात्र, मुख्याधिकारी, अभियंता आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट होत नाही. भेट झाली तरी आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे आमच्याकडे पाहणारे कोणीच नाही," अशी प्रतिक्रिया परिसरातील महिलांनी दिली.
परिसरात वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या बोअरवेलचे पाणीही काही मोजक्याच नागरिकांना मिळत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी केली. इतर नागरिकांना तेथून पाणी भरू दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाणीटंचाई निवारणासाठी पूर्वी खोदण्यात आलेल्या बोअरवेल दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप नगरसेविका पद्मीनबाई एंगडे यांनी केला आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि अभियंता यांच्या संगनमतातून अल्पसंख्याक विभागातून प्राप्त निधीचा गैरवापर झाल्याचा त्यांचा दावा आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप अपेक्षित कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
"प्रभाग क्रमांक ९ मध्ये पालिका प्रशासनातील अधिकारी, कंत्राटदार आणि अभियंता जाधव यांनी संगनमत करून दहा लाख रुपयांचे खोटे बिल उचलल्याचा माझा आरोप आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण न्यायालयात दाखल करून न्याय मागणार आहे."
पाणीटंचाई आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर पालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे या तक्रारींची चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.— नागेश एंगडे, नगरसेविका पद्मीनबाई एंगडे यांचे पुत्र