पूर्णा: धानोरा काळे (ता. पूर्णा) गावाजवळील गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने अतिवृष्टी अनुदान, पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन, कापसाचे पडलेले भाव, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, आदी मागण्यांसाठी आजपासून (दि.१८) बेमुदत जलसमाधी आंदोलनाला सुरूवात केली.
तत्पूर्वी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव व प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील आयसीआयसी लोंबार्ड पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी सतीश बेदरे व अन्य एक अधिकारी यांनी पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वाभीभानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन आंदोलन करु नये, यासाठी चर्चा घडवून आणले. परंतु, त्यातून मागण्या मान्य करण्याविषयी कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने आज दुपारी १ वाजता शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनास प्रारंभ केला.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव भोसले व आंदोलनकर्त्यांशी 'दै. पुढारीशी' संवाद साधला. ते म्हणाले की, जोपर्यंत प्रत्यक्षात मंजूर असलेली पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई व ईकेवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान वर्ग होण्यास सुरुवात होत नाही, तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन चालूच राहणार आहे.
दरम्यान, महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी सर्वोतोपरी खबरदारी घेत पाणबुडी बोट व इतर रेस्क्यू टीम गोदावरी नदीपात्रात तैनात केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सपोनि गजानन मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.