Yashwant Sena NCP Panchayat Samiti member BJP joining
पूर्णा: पूर्णा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांच्या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या निकालात भाजपचे ४, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ३, अपक्ष २, यशवंत सेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ अशा एकूण १२ सदस्यांची निवड झाली होती. मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नव्हते.
मात्र, निकाल लागल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली गौर गणातील यशवंत सेनेचे नरेश अण्णा जोगदंड, ध. टाकळी गणातील यशवंत सेनेचे गोविंद (रमेश) सूर्यवंशी तसेच देगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विलास गिरी यांनी १२ फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथे डॉ. गुट्टे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशावेळी डॉ. गुट्टे मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, पूर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी नितीन उर्फ बंटी कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या घडामोडीची पूर्वकल्पना नसताना झालेल्या या राजकीय बदलामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रवेशांनंतर पंचायत समितीत भाजपची सदस्यसंख्या ७ वर पोहोचली असून पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या रणनीतीमुळे पंचायत समितीच्या सत्तास्थापनेत डॉ. रत्नाकर गुट्टे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
पूर्णा पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडे आता बहुमत असल्याने ओबीसी प्रवर्गातील सदस्य विलास गिरी यांची सभापतीपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळणार का, याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.