Purna Kharedi Vikri Sangh
आनंद ढोणे
पूर्णा : रब्बी हंगामातील हरभरा हमीभावाने खरेदीसाठी परवानगी मिळूनही पूर्णा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे केंद्र गेल्या महिनाभरापासून बारदानाअभावी ठप्प पडले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना नियमित बारदान उपलब्ध होत असताना सहकारी संस्थेला तोच पुरवठा का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१० मार्चपासून हरभरा खरेदीस सुरुवात करण्यात आली होती. मात्र सुरुवातीला जिल्हा फेडरेशनकडून अत्यल्प प्रमाणात बारदान पोते देण्यात आले. अवघ्या तीन दिवसांतच हा साठा संपला. त्यानंतर आजपर्यंत बारदान उपलब्ध न झाल्याने खरेदी केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापूराव घाटोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही बारदान मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी १५ एप्रिल रोजी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या खरेदी केंद्राला बारदान मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुसरीकडे, फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि इतर फेडरेशनच्या केंद्रांवर नियमित बारदान पुरवठा होत असून त्यांच्या खरेदीत कोणताही खंड पडलेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर मुला-मुलींच्या लग्नकार्यांची तयारी करणाऱ्या अनेक कुटुंबांवर याचा परिणाम झाला असून काहींची कामे लांबणीवर पडली आहेत. शेतकरी वारंवार खरेदी केंद्रावर ये-जा करून त्रस्त झाले असून त्यांच्यात संताप वाढत आहे.
बारदान पोते मिळत नसल्याने एका महिन्यापासून हरबरा खरेदी केंद्र बंद आहे.पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी दोन दिवसांत बारदान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, त्वरित बारदान उपलब्ध करून न दिल्यास शेतकरी हरभरा रस्त्यावर आणून आंदोलन करतील.- बापूराव घाटोळ, चेअरमन (पूर्णा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ)