ताडकळस : पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे विहिरीवरील मोटारीची तुटलेली वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (दि. २५ एप्रिल) दुपारी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
माधव दशरथ वाळवंटे (वय : ३०, रा. फुलकळस) हे मोहन सलगर यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारीची तुटलेली वायर जोडण्यासाठी गेले होते. काम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागून ते गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ०७/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मेहनती आणि शांत स्वभावाच्या माधव यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.