Parbhani News: Body of missing farmer found in farm drain
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील शेतकरी राजेश नामदेव सोनवणे (वय ४४) हे २३ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात या बेपत्ता प्रकरणाला दुर्दैवी कलाटणी मिळाली. शेतात जनावरांसाठी चारा तोडत असताना विद्युत खांबावरील लोंबकळणाऱ्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत महावितरणच्या असून, निष्काळजीपणामुळे एका कष्टकरी शेतकऱ्याचा जीव गेल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, राजेश सोनवणे हे २३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जनावरे चरण्यासाठी व त्यांच्यासाठी पाला आणण्याच्या उद्देशाने घरातून शेताकडे गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईकांनी घरी, शेत परिसरात तसेच विविध ठिकाणी मात्र काहीच मागमूस लागला नाही.
अखेर त्यांचे मोठे बंधू भगवान नामदेव सोनवणे (वय ६५) यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. शोध सुरू असतानाच शेतालगतच्या नालीमध्ये राजेश सोनवणे यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी जनावरांसाठी चारा तोडत असताना जवळील विद्युत खांबावरील लोंबकळणाऱ्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला कुटुंबातील आधारवड सुखरूप परत येईल, अशी आशा कुटुंबीयांना होती. मात्र, त्यांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दरम्यान, शेतातील विद्युत वाहिनी बराच काळ लोंबकळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधित वीजवाहिनीची वेळेत दुरुस्ती करण्यात आली असती, तर हा दुर्दैवी प्रकार टळला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मयताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या आदेशानुसार हवालदार मोरे तपास करीत आहेत.