चारठाणा, पुढारी वृत्तसेवा : कनका (ता. हिंगोली) येथील शिर्डीला दर्शनाला गेलेल्या भाविकांची जीप उलटून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले. तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना आज (दि. ३) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नांदेड - संभाजीनगर महामार्गावरील चारठाणा येथील साहिल धाब्याजवळ घडली. चालक झोपेत असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
रुक्मिणी चंदू चांभारे (वय 35) व दीपक सखाराम जाधव (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. तर नंदाबाई जाधव (वय 35), समर प्रभू कोरडे (वय 13), ऋतुजा अनिल महानूर (वय 10), उषा प्रमुख कोरडे (वय 35), परम चित्रा गण कोरडे (वय 40, संतोष विठ्ठल जाधव (वय 34), कार्तिक परमेश्वर कोरडे (वय 8), सोनाली अनिल महानूर (वय 25, सर्व रा. कनका, ता. हिंगोली) हे आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जीपमध्ये 17 जण भाविक होते. चालक झोपेत असल्याने जीपवरील नियंत्रण सुटून जीपने दोन पलट्या खाल्ल्या, असे बोलले जात आहे
या घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापूर, पोलीस जमादार रामकिशन कोंढरे, चालक रविराज वानरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.