परभणी : गंभीर व असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदनामुक्त, सन्मानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण जीवन मिळावे या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक राज्य पॅलिएटिव्ह केअर सेवा (उपशामक काळजी) कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील तसेच कधीच पूर्णपणे बरे न होणाऱ्या रुग्णांना घरपोच सर्वसमावेशक वैद्यकीय व मानसिक आधार देण्याचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. झाली आहे. जिल्हास्तरावर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. २७) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पॅलिएटिव्ह केअर समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. कल्याण कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. ऋषिकेश देशपांडे, जिल्हा रुग्णालयातील तज्ञ वैद्य आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यरत दोन स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रुग्णांचे वर्गीकरण; नियोजनबद्ध घरभेटी
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत २२ फेब्रुव ारीपर्यंत जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार रुग्णांचे तीन गट करण्यात आले असून यात तीव्र अवस्था (पूर्णतः इतरांवर अवलंबून मध्ये आठवड्यातून एकदा घरपोच वैद्यकीय सेवा, मध्यम अवस्था (आंशिक अवलंबित) मध्ये पंधरवड्यातून एकदा, म्हणजे महिन्यातून दोन वेळा सेवा तर सौम्य अवस्था (स्थिर) मध्ये महिन्यातून एकदा घरपोच तपासणी व मार्गदर्शन या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या घरीच वेदनाशामक उपचार, औषधोपचार, समुपदेशन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सल्लागार डॉ. ललित सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर मानसिक व सामाजिक आधारही मिळणार असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
वाढते आजार; दीर्घकालीन काळजीची गरज
जिल्ह्यात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड विकार, श्वसन विकार तसेच वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. यापैकी अनेक आजार पूर्णपणे बरे होणारे नसून रुग्णांना दीर्घकाळ उपचार व सातत्यपूर्ण देखरेखीची गरज भासते. अशा रुग्णांना केवळ औषधोपचार पुरेसे नसून शारीरिक वेदना कमी करणे, मानसिक आधार देणे, कुटुंबीयांना समुपदेशन करणे आणि आवश्यकतेनुसार घरपोच सेवा देणे अत्यावश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर पॅलिएटिव्ह केअर सेवा राबविण्यात येत आहे.
रुग्णालयांत खाटा राखीव
जिल्हा रुग्णालय येथे अशा रुग्णांसाठी १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी २ ते ३ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अत्यवस्थ रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे रुग्ण रुग्णालयात येऊ शकत नाहीत त्यांनी टेलिकन्सलटेशनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मानसिक आधारासाठी मटेलीमानसफटोल फ्री क्रमांक १८००८९१४४१६ उपलब्ध आहे. तसेच १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले.