जिंतूर : मागील पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजातील नागरिकांचे सुरू असलेल्या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेतलेली नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 31 जानेवारी बोंबमारो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिला आहे.
मराठा समाजाचा सरसगट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा यासाठी 25 जानेवारी पासून अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण,महिला वयोवृद्ध व्यक्ती आमरण उपोषणाला बसले आहेत. परिणामी अनेक आंदोलकांची तब्यत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. असे असताना राज्य सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत आहेत.
आगामी काही दिवसात सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून तत्काळ उपोषण सोडवावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून याची सुरुवात बोंबमारो आंदोलन करून करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सकल मराठा समाजातील नागरिकांच्या सह्या आहेत.