मानवत : नाफेडमार्फत हरभरा खरेदीची मर्यादा हेक्टरी 14 क्विंटल वरून 25 क्विंटल करण्याची सूचना नाफेडला द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने गुरुवारी (दि.9) परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.
भाकपचे जिल्हा कमिटी सदस्य लिंबाजी कचरे व मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष बालासाहेब आळणे यांनी याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी वातावरण अनुकूल असल्याने शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे उत्पन्न एकरी 10 ते 12 क्विटल पर्यंत आलेले आहे. पंरतू नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा हरभरा हेक्टरी 14 क्विटल खरेदीची मर्यादा लावल्याने शेतकऱ्यांना राहिलेला हरभरा खाजगी व्यापाऱ्यांना बे-भाव विकावा लागत आहे.
नाफेडमार्फत शेतकऱ्यांचा हरभरा 5825 रु. प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी केला जातो. परंतु तोच उर्वरित हरभरा शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना सरासरी 4,900 रुपया प्रमाणे विकावा लागत आहे. सरासरी शेतकऱ्यांची प्रति क्विटल 975 रुपये ऐवढे नुकसान होत आहे. ही बाब शेतकऱ्यांना परवडनारी नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सदरील आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.