मानवत : मानवतरोड रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली. धर्माबादहून मनमाडकडे जाणाऱ्या हायकोर्ट एक्सप्रेसच्या खाली आल्याने एका ४२ वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात प्रवाशाचे दोन्ही पाय निकामी झाले होते. ही घटना शनिवार, दिनांक १३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकनाथ कोंडीबा सत्वधर (वय ४२, रा. झरी, ता. पाथरी) असे या रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पाथरी तालुक्यातील झरी येथील रहिवासी असलेले एकनाथ सत्वधर हे काही कामानिमित्त जालना येथे जाणार होते. यासाठी ते शनिवारी सकाळीच मानवतरोड रेल्वे स्थानकावर आले होते. सकाळी ७ वाजेच्या सुमारास धर्माबाद ते मनमाड जाणारी 'हायकोर्ट एक्सप्रेस' मानवतरोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत असतानाच, अचानक एकनाथ हे धावत्या रेल्वेच्या खाली आले. ही धडक एवढी भीषण होती की, यात एकनाथ यांचे दोन्ही पाय गंभीररीत्या तुटले आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. स्थानकावरील प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघाताची माहिती मिळताच त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच झरी गावासह पाथरी परिसरात शोककळा पसरली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता परभणी रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. एकनाथ सत्वधर यांचा मृत्यू रेल्वे पकडताना झालेल्या अपघातामुळे झाला, की त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली? याचा अचूक शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. पोलीस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत असून पुढील तपास सुरू आहे.