परभणी : सप्टेंबरच्या सुरूवातीला जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढल्यानंतर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देखील पावसाचे आगमन जोरदारपणे सुरू झाले आहे. रविवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सायंकाळच्या सुमारास जोरदार बरसला. परतीच्या या पावसाने आकडेवारीत वाढ होत असून सरासरी पावसाशी आतापर्यंत १०८ टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ५.३ मि.मी.ची नोंद झाली.
यंदा जुन व जुलैमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात बरसला ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी भरपाई करण्यात पावसाने आगेकुच केली. पण त्याहीपेक्षा ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात दाणादाण उडाली. संपूर्ण ५२ महसुली मंडळात या अतिवृष्टीने शेती व पीकांचे मोठे नुकसान झाले. त्या प्रमाणात जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे प्रकल्प या अतिवृष्टीने तुडूंब भरले. नद्या, नाल्यांना पूर आला.
वार्षिक सरासरीच्या जवळ म्हणजेच ९४ टक्के पाऊस २ सप्टेंबरपर्यंत झाला होता. त्यानंतर १५ दिवस पावसाने उघडीप दिली. परिणामी आता परतीच्या पावसाकडे लक्ष असतानाच सप्टेंबरच्या अखेरीस रविवारपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी मुसळधार पावसाने तर सोमवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी सकाळी चांगले ऊन पडले होते. मात्र दुपारी ३ नंतर शहरासह परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले.
दरम्यान मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस पाथरी तालुक्यात १६.१ तर त्या खालोखाल गंगाखेडमध्ये १२.६ मि.मी. नोंदला गेला. परभणीत ४.१, सेलूत ३.४, मानवतमध्ये ६.६ मि.मी. पाऊस झाला. जिंत्र, पूर्णा व पालममध्ये तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर सोनपेठमध्ये पावसाची नोंदच झाली नाही. २४ सप्टेंबरपर्यंत १३५.२ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत २३१.६मि.मी. म्हणजेच १७१.३ टक्के सप्टेंबरमधील पावसाची सरासरी राहिली.
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६१.३ मि.मी. इतकी असून आतापर्यंत ७९१ मि.मी. पाऊस झालेला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीशी १०३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी २४ सप्टेंबरपर्यंत ४४२.१ मि.मी. पाऊस झाला होता. ते प्रमाण ६०.८ टक्के इतके होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ४३ टक्क्यांनी पाऊस जास्त राहिल्याने यंदा पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. त्याचबरोबर रब्बी पीकांसाठी देखील हा परतीचा पाऊस लाभदायक ठरणार आहे.