गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गोर बंजारा ऊसतोड कामगारांची साखर निर्मितीत मोलाची भूमिका आहे. तरीही सर्वांगीण विकासापासून कोसो दूर असलेल्या या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बार्टी'च्या धर्तीवर 'वनार्टी' (वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर) स्थापन केली जाईल, अशी घोषणा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज (दि. १६) केली. ढवळकेवाडी तांडा येथे गोर बंजारा ऊसतोड कामगारांचा राज्यातील पहिला महामेळावा झाला. यावेळी ते (Sanjay Rathod) बोलत होते.
संजय राठोड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यभरातील गोर बंजारा ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. गोर बंजारा ऊसतोड कामगारांच्या सर्व मागण्यां मंजूर होतील. 'सेवायुग' सुरू होईल, असे सांगत गोर बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'बार्टी'च्या धर्तीवर गोर बंजारा ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी 'वनार्टी' स्थापन केली जाईल. गोर बंजारा ऊसतोड कामगारांच्या राज्यातील या पहिल्या महामेळाव्यास राज्यभरातून ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा