Proposed railway line dispute Purna
पूर्णा : दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून प्रस्तावित चुडावा–मरसूळ रेल्वे बायपास प्रकल्पाला पूर्णा तालुक्यातील आडगाव लासिना, बरबडी आणि गौर शिवारातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या बायपास मार्गात शेतकऱ्यांची उपजिविकेची जमीन जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
जमिनींचे बाजारभाव सध्या प्रचंड वाढले असून, कमी मोबदल्यात भूसंपादन होण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे. त्यामुळे, "जमीन देण्यापेक्षा जीव देऊ, पण बायपास होऊ देणार नाही," असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर २१ जुलैपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यासाठी विठ्ठल भोरे, कैलाश ठाकरे, भाऊराव सोनवळे, मुंजाजी सोनवळे, बळीराम गौंड, यादवराव जाधव, पंचफुलाबाई भोरे, नवनाथ दवणे, चांदू पारवे, राजकुमार जोगदंड आदी शेतकऱ्यांनी आज (दि.१८) तहसीलदारांना निवेदन दिले.
दमरे रेल्वे विभागाने चुडावा–मरसूळदरम्यान सुमारे ३.२२ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे बायपास मार्गाला मंजुरी दिली आहे. या मार्गासाठी आडगाव लासिना, बरबडी, गौर या गावांच्या शिवारातील जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.
भूसंपादनासाठी रेल्वे विभाग आणि महसूल विभागाकडून या जमिनींवर सिमेंट खांब रोवून, मिनी बोअरवेल्सद्वारे जमिनीखालील खडकाचे प्रमाण तपासण्यात आले. मात्र, संबंधित शेतकऱ्यांना याबाबत योग्य दर न देता जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या बायपासमुळे काही विशेष गाड्या पूर्णा स्टेशनवर थांबवण्यात न येता थेट बायपासमार्गे पुढे वळवल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, "रेल्वे जंक्शन" म्हणून ओळखले जाणारे पूर्णा स्टेशन नाममात्र राहण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केवळ शेतकरीच नव्हे, तर संपूर्ण पूर्णेकर जनता या प्रस्तावित बायपास प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहे. "जनता आणि शेतकऱ्यांचा एकच सूर – हा बायपास कधीही मंजूर होऊ देणार नाही," असा निर्धार दिसून येतो आहे.