Farmers have the first right over the government treasury
परभणी, पुढारी वृत्तसेवा : सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचा तसेच लाडक्या बहिणींचा आणि युवकांचाही आहे. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
परभणी शहरातील स्टेडियम मैदानावर रविवारी आयोजित शेतकरी-युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. खा. संजय जाधव यांच्या वतीने या शेतकरी-युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात जरांगे यांचा उल्लेख केला. जरांगे यांची मराठा समाजाबद्दलची तळमळ आपल्याला माहिती आहे. मराठा समाज हा कष्टकरी समाज असून त्याच्या न्याय्य प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील आहे, असे त्यांनी सांगितले.
महायुती सरकार हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे सरकार आहे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, ही सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे शिंदे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
कोणत्याही समाजावर अन्याय न करता आणि सर्व घटकांचे हित जपत मराठा समाजाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा संवेदनशील असून तो कायद्याच्या चौकटीत आणि सनदशीर मार्गाने सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संवादाच्या माध्यमातून आणि कायद्याच्या अधीन राहून प्रश्नांवर निश्चितपणे मार्ग काढता येऊ शकतो, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी सरकार विविध स्तरांवर काम करीत असल्याचे नमूद केले.
परभणीत नवीन एमआयडीसी
परभणी जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी औद्योगिक विकासावर विशेष भर दिला. परभणीत नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. जिल्ह्यात उद्योग वाढल्यास स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल, रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होईल आणि परभणीच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.