20,000 Farmers in Parbhani Without Crop Insurance
सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा एकीकडे अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने अक्षरशः उध्वस्त झालेली शेती, तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या आणि प्रशासनाचा बेजबाबदार कारभार या दुहेरी संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. खरीपात तब्बल २० हजार ७९१ शेतकऱ्यांनी २७ हजार ३४३ हेक्टरवर पिकविमा काढून ३ कोटी ७ लाख १३ हजारांचा प्रीमियम भरला, मात्र आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही.
सोनपेठ, शेळगाव, आवलगाव आणि वडगाव या चार महसूल मंडळांतील ५२ गावांमधील शेतकऱ्यांनी शासनाच्या नव्या पिकविमा योजनेवर विश्वास ठेवत कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी पिकांची पेरणी केली होती. पिके जोमात असतानाच निसगनि घात केला.
मुसळधार पावसाने आणि त्यानंतरच्या पूरपरिस्थितीने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात वाहन नेल्या. अनेक ठिकाणी उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली, तर काही ठिकाणी सुपीक जमीनच वाहून गेल्याने शेती पुन्हा उभी करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागणार आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळण्यात झालेला विलंब. शासनाने पिक कापणी प्रयोग हा निकष ठेवून योजना राबवली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.