Vishnupuri Dam 
नांदेड

विष्णुपूरीतून दररोज साडेसहा मिलीमीटर पाण्याचे बाष्पीभवन

nanded news | गतवर्षीपेक्षा ४० टक्के जलसाठा अधिक : पाणीटंचाईची चिंता नाही

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : विष्णुपूरी प्रकल्पाचे बॅकवॉटर ६० किलोमीटरपर्यंत असून सध्या एप्रिलअखेर सूर्य आग ओकत आहे. या परिस्थितीत दररोज ६.३० मिलीमीटर बाष्पीभवन होते आहे; तरी देखील गतवर्षीपेक्षा सुमारे ४० टक्के जलसाठा अधिक आहे. शिवाय दिग्रस बंधाऱ्यात २१.८१ दशलक्ष घनमीटर साठा असून त्यापैकी १६ दशलक्ष घनमीटर नांदेडसाठी राखीव आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची सुतराम शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पाणी कपातीबाबत अद्याप विचार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

गतवर्षी पावसाळ्यात १२२०.३० मिलीमीटर अर्थात १३६.९१ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाई भासणार नाही, असे अपेक्षित होते. त्यानुसार एप्रिल अखेरपर्यंत टंचाईबाबत फारशी ओरड नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी कपातीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही; तरी देखील महापालिका हद्दीच्या बाहेर ज्या वसाहतीत महानगरपालिका पाणी पुरवठा करते, तिथे मात्र खंडीत स्वरुपात पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. दरम्यान, विष्णुपूरी प्रकल्पात उपलब्ध पाणी साठा पाहता यावर्षी शहरात पाणी कपात करण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विष्णुपूरी प्रकल्पाची साठवण क्षमता ८० दशलक्ष घनमीटर असताना सध्या ६१.३२ दशलक्ष एकूण तर ५८.५६ दशलक्ष घनमीटर जीवंत जलसाठा आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी ७२.४८ टक्के असून गतवर्षी आजघडीला केवळ २५.७५ टक्के उपयुक्त जलसाठा होता. त्याची टक्केवारी ३२.३९ टक्के होती. अर्थात मागीलवर्षीपेक्षा यंदा ४०.०९ टक्के साठा अधिक आहे. यावरून यंदाच्या पाणी मुबलकतेची कल्पना येते. पाण्याची एकूण उंची ९ मीटर असून सध्याची उंची ७.५५५ मीटर आहे. या पार्श्वभूमीवर दररोज ६.३० मिलीमीटर बाष्पीभवन होत आहे. एवढी सुद्धा दरवर्षी उपलब्ध पाणीसाठ्यातून सुमारे २० टक्के बाष्पीभवन होते, अशी माहिती मिळाली.

विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरील भागात दिग्रस बंधारा असून त्याची एकूण साठवण क्षमता ६३.८० दशलक्ष घनमीटर असून आजघडीला येथे २१.८१ दलघमी जलसंचय उपलब्ध आहे. या बंधाऱ्यात नांदेड महानगरपालिकेकडे १६ दलघमी पाणी राखीव असते. त्यामुळे हा साठा हातचा मानला जात असून गतवर्षी या बंधाऱ्यातून सुद्धा विक्रमी म्हणजे १३ हजार ३४७.७३ दलघमी विसर्ग करण्यात आला. याशिवाय इसापूर (जि. वाशिम) व येलदरी (जि. परभणी) या नांदेडसाठी उपयोगी धरणांमध्ये सुद्धा ६० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा शिल्लक आहे.

उदंड आहे उदक शेतीभाती करावया....

नांदेड जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प असून पैकी विष्णुपूरीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. तर मानार धरणात ४८.१२ टक्के जलसाठा आहे. ९ मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक, ५ प्रकल्पात २५ ते ५० टक्के आणि दोन प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ९ उच्च पातळी बंधाऱ्या पैकी एकामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ५ बंधाऱ्यांत ५० ते ७५ टक्के एकामध्ये २५ ते ५० टक्के तर २ बंधाऱ्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ८० लघु प्रकल्पांपैकी १३ मध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक तर अन्य ३४ प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नांदेडच्या तुलनेत हिंगोली व परभणी जिल्ह्यात मात्र जलसाठ्याच्या बाबतीत वस्तुस्थिती फारशी आशादायी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT