उमरखेड : पैनगंगा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या जंगलभागात रविवारी (दि.22) रात्री अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. घमापुर, कुरळी, नारळी, अमडापूर, टाकळी (बंदी), चिखली (वन), भवानी, वालतूर, कोरटा, दराटी (बंदी) आदी गावांमध्ये शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार गहू, हरभरा, ज्वारी, मका तसेच इतर हंगामी पिकांचे सुमारे ७५ टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वादळामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून काही ठिकाणी काढणीस तयार असलेला गहू आणि हरभरा पूर्णपणे जमिनीवर कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून उभ्या पिकांची गुणवत्ता घसरली आहे.
बंदी भागातील नागरिक व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती हाच मुख्य उत्पन्नाचा स्रोत असल्याने या नुकसानीमुळे कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होणार आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. फोटो ओळी पण आवरण्यात गावांमध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मका व गहू पिकाचे अशाप्रकारे मोठे नुकसान झाले आहे.