उमरी : शहरातील उमरी ते गोरठा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन उमरी नगर परिषदेच्या वतीने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असून हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून नाली बांधकामासह मोठा करण्यात येणार आहे.
उमरी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. नगर परिषदेच्या वतीने सोमवारी उमरी ते गोरठा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उमरी शहराच्या अनेक भागांतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अनेक ठिकाणी सरकारी जागेसह अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत उमरी शहराच्या अनेक भागांतील अतिक्रमणे काढून तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी उमरी ते गोरठा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. उमरी ते कारेगाव फाटा जाणाऱ्या मध्यवर्ती रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. तीही लवकर हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी होत आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत उमरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश चाटे, कार्यालयीन अधीक्षक कांचन पडलवार, बांधकाम विभागाचे अभियंता कैलास यमलवाड, विनोद सावंत, बालाजी चवरे, चंद्रकांत श्रीकांबळे, गणेश मदने, शंकर पाटील, शंकर माने, सदानंद गायकवाड, आकाश खंदारे, सचिन गंगासागरे, अंकुश सवई, नरेंद्र खंदारे आदींसह नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसह पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलिस उपनिरीक्षक सचिन मारमाळ यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, शहरातील बहुतांश भागातील नागरिक किंवा मध्यवर्ती भागातील व्यापारी आपल्या दुकानातील व घरातील केरकचरा, प्लास्टिक, टाकाऊ वस्तू सर्रास घरासमोरील नाल्यात टाकत असल्याने नाल्या तुडुंब भरल्या असून पाणी साठून राहते. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
या बाबीकडे उमरी शहरातील नागरिकांनी लक्ष घालून आपले शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दुकानातील केरकचरा टाकाऊ पदार्थ नाल्यात न टाकता घंटा गाडीचा वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.