उमरी : पाऊस-पाऊस म्हणून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मृग नक्षत्र कोरडा गेल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा अजून किती दिवस करावी लागणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी केली असून बी-बियाणे खते घेऊन घरात ठेवले आहेत. मृग नक्षत्रात पाऊस पडले, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक गेला. मृग नक्षत्राच्या प्रारंभी काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
त्यानंतर पावसाने उघडीप दिली. पावसाळ्याचे दिवस असताना देखील उन्हाळ्या सारखे कडक ऊन पडत आहे. उमरी तालुक्यातील अनेक गावातील विहिरी, तलाव, बोअर कोरडे पडत आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही दिवसात पाऊस झाला नाही तर पुन्हा शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थिती ओढावेल. शेतीची संपूर्ण मशागत करण्यात आली असून आता फक्त प्रतीक्षा पावसाची आहे. परंतु पाऊसच नसल्याने सर्वच जण चिंतातूर झाले आहेत. पावसाअभावी कृषी बाजारपेठेतही शुकशुकाट दिसत आहे.