The national flag manufactured in Nanded is being hoisted in 16 states across the country
संतोष जोशी
नांदेड : दिल्लीचा ऐतिहासिक लालकिल्ला, मुंबईतील 'मंत्रालय', विविध राज्यांतील जिल्हाधिकारी कार्यालये ते अगदी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींपर्यंत स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आणि महाराष्ट्रदिनी अत्यंत अभिमानाने फडकणारा तिरंगा राष्ट्रध्वज नांदेडमध्ये आकारास येतो. देशभरात खादीच्या अधिकृत राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या मोजक्या चार प्रमुख केंद्रांमध्ये नांदेडचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे तयार होणारा राष्ट्रध्वज तिरंगा देशातील १६ राज्यांत दिमाखाने फडकतो आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात असल्याने गेल्या काही वर्षांत राष्ट्रध्वजाची मागणी प्रचंड वाढली आहे. नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे मुख्य कार्यालय आहे. या संस्थेचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. १९५५ पासून राष्ट्रसेवेचा गौरवशाली प्रवास या खादी संस्थेची सुरुवात १९५५ मध्ये झाली असून, १९६७मध्ये तिची औपचारिक नोंदणी झाली.
तेव्हापासून आजतागायत या केंद्रात पूर्ण निष्ठेने खादीच्या राष्ट्रध्वजांची निर्मिती केली जात आहे. येथे विविध शासकीय व निमशासकीय गरजांनुसार एकूण ११ वेगवेगळ्या आकारांचे राष्ट्रध्वज शिवले जातात. यामध्ये टेबलवर ठेवल्या जाणाऱ्या अगदी लहान आकाराच्या ध्वजांपासून, वाहनांवर लावण्यात येणारे ध्वज आणि लालकिल्ला व मंत्रालयासारख्या भव्य इमारतींवर फडकणारे १४ बाय २१ फूट आकाराचे भव्य राष्ट्रध्वज तयार केले जातात. या राष्ट्रध्वजांची किंमत आकारानुसार ६० रुपयांपासून ते २९ हजार रुपयांपर्यंत आहे.
मराठवाड्यासाठी अभिमानास्पद
"खादी हे केवळ कापड नसून, तो एक राष्ट्रीय विचार आहे. हुबळी (कर्नाटक), दिल्ली, मुंबई आणि नांदेड या चारच ठिकाणी खादी ग्रामोद्योग नियमांनुसार राष्ट्रध्वज तयार केले जातात. महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड या दोनच केंद्रांवर ही निर्मिती होते. नांदेडहून देशातील सुमारे १६ राज्यांमध्ये हे राष्ट्रध्वज पाठवले जातात, ही संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब आहे," अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर यांनी दिली. या केंद्रात वर्षातील ३६५ दिवस राष्ट्रध्वज निर्मितीचे काम अविरत सुरू असते. १ एप्रिल ते ११ ऑगस्ट या अवघ्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीतच सुमारे साडेसात हजार राष्ट्रध्वजांची विक्री झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
अशी पार पडते 'तिरंगा' निर्मितीची खडतर प्रक्रिया
खादीचा राष्ट्रध्वज बनवणे हे साधे काम नसून, अत्यंत कडक नियमावली आणि गुणवत्तेचे निकष पाळून केले जाणारे कार्य आहे. ध्वज निर्मितीची प्रक्रिया खालीलप्रमाणे पार पडते :
कापड विणकाम (उदगीर):
राष्ट्रध्वजासाठी लागणाऱ्या विशेष खादी कापडाची निर्मिती लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होते. रंगकाम करून उदगीरवरून आलेले हे विशेष खादी कापड रंगरंगोटीच्या आणि प्रक्रियेच्या कामासाठी गुजरात मधील अहमदाबाद येथे पाठवले जाते.
अशोक चक्र व अंतिम शिलाई (नांदेड):
कापड पूर्ण प्रक्रिया होऊन नांदेडला परत आल्यानंतर त्यावर अचूक मापाचे 'अशोक चक्र' छापून घेतले जाते. त्यानंतर तब्बल ४५० हून अधिक अनुभवी कारागीर दिवसंरात्र मेहनत घेऊन या राष्ट्रध्वजांची अत्यंत शिस्तबद्ध शिलाई करतात
आकाराची विविधता :
राष्ट्रध्वजाराचा आकार हा १४x२१ फूट (सर्वांत मोठा), ८४२१ फूट, ६४९ फूट, ४४९ फूट, ३xसाडेचार फूट, २४३ फूट आणि साडेसहा x९ फूट यांसह ११ विविध प्रकाराच्या आकारांत ध्वज उपलब्ध असतात-