नांदेड : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असताना मराठवाड्यातील सर्व जलाशये पूर्णपणे भरले आहेत. लहान मोठ्या सर्व जलाशयांच्या मिळून एकूण ६१ दरवाजांतून गुरुवारी (दि. २६) सकाळी ५४८ दशलक्ष घनमिटर पाणी सोडले जात होते. पुढे तेलंगणातील श्रीराम सागर (पोचमपाड) व निजामसागर ही धरणंही १०० टक्के भरली असून त्यातूनही विसर्ग करण्यात येत आहे. मराठवाड्यात जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, लोअर दुधना, अपर मानार व लोअर मानार ही सात मोठी ते मध्यम धरणं आहेत. शिवाय वाशिम जिल्ह्यातील इसापूर धरणात नांदेड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित असते.
शिवाय ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस, अंतेश्वर, विष्णुपुरी, आमदुरा, बळेगाव आणि बाभळी हे मोठे बंधारे आहेत. यातील जलसाठ्यावर गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील शेती आणि सजिवांची तहान अवलंबून आहे. धरणांपैकी छ. संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी हे सर्वाधिक २१७० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचे धरण आहे.