नांदेड ः नांदेड जिल्ह्यात वाळूमाफियांनी वाळू तस्करीचा अक्षरशः कहर केला आहे. माहूर तालुक्यात तर वाळूमाफियांनी चक्क पीएसआयला धक्काबुक्की करून शिवागाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. 2 रोजी घडली.या प्रकरणात वाळूमाफियासह चार जणांवर माहूर पोलिस ठाण्यात शासकीय कामात व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सह्याद्री टी पॉइंटजवळून एम.एच. 29 सीएम 0676 क्रमांकाचा टिप्पर वाळू घेऊन जात असताना पीएसआय संदीप सुरेश बोईनवाड व पथकाने टिप्पर चालकाला वाळूच्या रॉयल्टीची पावती आहे का अशी विचारणा केली असता. चालकाने दोघा - तिघांना बोलावून घेतले.
त्यावेळी टिप्पर मालक राहुल विजय मुसळे, शक्ती भरतसिंह ठाकूर, एकनाथ अंबादास मानकर, अमित शंकर पाऊलबुध्दे या चारजणांनी मिळून आमची टिप्पर का आडवता म्हणत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली व टिप्पर पळवून नेला. या प्रकरणी पीएसआय संदीप सुरेश बोईनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यात मोठ्याप्रमाणात अवैध वाळूची तस्करी व वाहतूक केली जात आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई मोहीम सुरू आहे. अशातच वाळूमाफियांची मुजोरी एवढी वाढली आहे. चक्क पोलिसांवर दादागिरी केली जात आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे किती मनोबल उंचावले आहे. हे या घटनेवरून दिसून येते. वाळूमाफियांचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे असून, कारवाईची मोहीम आणखी तीव करण्याची गरज आहे.