विठ्ठल फुलारी
भोकर : मुलगी दोन्ही घरची लक्ष्मी असते असं नुसतं म्हणायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं असं मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या भोकर तालुक्यात एक हजार मुलांमागे ८५२ मुली आहेत. याच मुलांना नोकरी नसल्याने कोणताही बाप आपली मुलगी द्यायला तयार होत नसल्याने तालुक्यातील ६ हजार मुलांचे लग्न जुळत नसल्याने आता बायको देता का कोणी बायको असं म्हणण्याची वेळ तरुणांवर आली आहे.
विवाह आयुष्यातील आनंदाचा सोहळा. पण हा सोहळा उपभोगण्याचे भाग्य आजच्या अनेक तरुणांना मिळत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील कुठलातरी एक कोपरा रिता असतो. शैक्षणिक प्रगती, नोकरी, परदेशगमन, व्यवसाय, अर्थार्जन, विवाह, वैवाहिक सुख, संतती, मानसिक स्थैर्य, शरीर संपदा यातील काहीतरी एक गोष्ट माणसाला नसते किंवा ती मिळतच नाही. हे खरं असलं तरी भोकर तालुक्यात २१ ते ३० वयोगटातील मुलांपेक्षा मुलींची संख्या १५ टक्क्यांनी कमी आहे.
किंबहुना अशीच परिस्थिती अन्य तालुक्यात आहे. त्यामुळे संभ्रमामध्ये पंधरा मुले लग्नाविना राहावे लागते. एकीकडे मुलगी दोन्ही घरची लक्ष्मी म्हणायचे आणि मुलगी झाली की नाक मुरडायचे अशा प्रकार तीन तपापूर्वी होत होता, आताही होत आहे. यामुळे मुलींच्या संख्येत घट झाली. निसर्गाच्या चक्रात मानवाने केलेल्या हस्तक्षेपामुळे आज भोकर तालुक्यात १ हजार मुलांमागे अवघ्या ८५२ मुली असे व्यस्त प्रमाण झाले आहे. ज्या लेकींना जन्माला येण्यापूर्वीच नाकारले गेले, त्यांची उणीव आज समाजाला लग्नाच्या बाजारात प्रकर्षाने जाणवत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता ३० ते ३५ वयोगटातील अविवाहित तरुणांची संख्या मोठी आहे. लग्नासाठी वयोमर्यादा ओलांडली जात असल्याने या तरुणांमध्ये मानसिक नैराश्यही वाढत आहे. 'घर आहे, शेती आहे, पण घरात लक्ष्मी नाही, अशी खंत अनेक पालकांनी बोलून दाखवली. ही सामाजिक विषमता वेळीच दूर झाली नाही, तर भविष्यात कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
अगोदर सुकावावे आता भोगायचे विवाह ही आयुष्यातील सुखद घटना आहे. अनेकदा हे सुख परमेश्वराने अनेकांच्या ओंजळीत घातलेले नाही, भले त्यांना पैसा आणि इतर भौतिक सुखात कमतरता नसेल, पण विवाहापासून अनेकांना वंचित ठेवले आहे. हे असे का? तर त्याला उत्तर म्हणजे मागील तीस वर्षांपूर्वी मुलगी नको म्हणून केलेली चूक आता भोगायला लागली आहेत.
भोकर तालुक्यातील तरुणांना एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग येतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही आणि होणारही नाही. कारण येथील जागा आता छोटे व्यवसाय करण्यासाठी व्यापाऱ्यांना देण्यात येणार आहे. ८० टक्के कोरडवाहू जमीन असलेल्या भोकर तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही. बेकारीचे प्रमाण वाढले असल्याने ही मुले लग्नाविना दिवस काढत आहेत.
शेती हवी पण शेतकरी नवरा नको गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात लग्ने जुळवण्यात सातत्याने अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकऱ्यांच्या घरात नांदायला 'सून' मिळणे कठीण झाले आहे. मुलींच्या लग्नाचे वय ग्रामीण भागात वाढत चालले असून अनेकांनी तर लग्न जुळण्याची आशा सोडून दिली आहे. मुलाची चौकशी करताना त्याच्या सातबाऱ्याचा विचार केला जातो पण तो मुलगा शेती करत असेल तर नाकारले जाते.