नांदेड / परभणी, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा हे भारताचे सुरक्षा कवच आहे. येथे मुघल आले आणि गेलेही. या क्षेत्रात दुष्काळ, पाण्याचे संकट आणि अन्य प्रश्न एका दिवसात निर्माण झालेले नाहीत. याच मराठवाड्याचा गळा घोटण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे, असा आरोप करत येथील युवकांना स्थलांतर करावे लागले आहे. आता शेतकर्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार काम करत आहे. पुढील पाच वर्षांत मराठवाडा आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड आणि परभणीच्या सभेत दिली.
नांदेड लोकसभेचे महायुतीचे भाजप उमेसवार प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोलीतील शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमधील मोदी ग्राऊंड येथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस गरीब, मजुरांच्या विकासाआड येते. आम्ही या वर्गासाठी काही केले तर आमची खिल्ली उडविली जाते. जनतेवरही ज्यांचा भरवसा नाही, ते देशाच्या विकासाची अपेक्षा काय करणार. तसेच मरावाड्यातील प्रश्नांचे निराकरण काय करणार, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. किसान सन्मानसाठी नांदेडमध्ये तेराशे करोडचा निधी दिला गेला. येथे ज्वारी, बाजरीचे पीक जास्त घेतले जाते. येथील बंद विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. शक्तिपीठ मार्गाला मंजुरी दिली आहे. याशिवाय लातूर येथे रेल्वे कोचचा कारखाना सुरू केला आहे. पुढील पाच वर्षांत मराठवाडा आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे. प्रत्येक जखमेवर उपचार करणे हीच मोदीची गॅरंटी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. विकसित भारत व विकसित मराठवाड्यासाठी नांदेडचे प्रताप पाटील खिलीकर आणि हिंगोलीचे बाबूराव कदम यांना विजयी करा. हे दोघेही खासदार बनून मला शक्ती देतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची अवस्था 'जित्याची खोड'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेस पक्षात अपसात भांडणे सुरू आहेत. त्यांच्याकडे कोणते मुद्दे नाहीत. 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही', अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. देशाच्या प्रगतीची ही निवडणूक आहे. दहा वर्षांत जे मोदींनी केले ते काँग्रेस शंभर वर्षांत करू शकत नाही, अशी टीका केली. ज्यांना स्वत:ची विजयाची गॅरंटी नाही ते काय जनतेला गॅरंटी देणार, असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांना टोला मारला. यावेळी योजनांची माहिती देऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक लोकांना भडकवत आहेत. दहा टक्के आरक्षण दिले, कुणबी प्रमाणपत्र दिले, हे सरकार आपले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार राजूकर यांचीही भाषणे झाली.
मराठा आरक्षण टिकणारच : शिंदे
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन आम्ही पूर्ण केले. या समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण टिकणारे आहे. ज्यांनी आरक्षण देतो म्हणून समाजाची दिशाभूल केली, त्यांचे ऐकू नका. विरोधकांकडून अपप्रचार सुरू असला तरी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.