बिलोली ः वाळूची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव हायवाने पादचाऱ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास सगरोळी येथील अनुसया नगरात घडली. विठ्ठल गोविंद लवटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
16 मे रोजी सकाळी 10 च्या दरम्यान हायवा (एमएच 20 जीसी 0793) वाळू घेऊन देगलूरकडे जात होता. अनुसयानगर परिसरातील विठ्ठल लवटे हे रस्त्यावरून जात असताना त्याना सदरील हायवाने धडक देऊन चिरडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. एकंदरीत पहाता दिवसरात्र रेतीची वाहतूक चालू आहे. वाहचालक हे सुसाट वेगाने वाहन चालवत असून यामध्ये विना नंबर प्लेटच्या वाहनांचा भरणा जास्त आहे.
परिणामी अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. यामुळे नाहक नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देेवून फिरते पथक नेमावे व वाळूच्या वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांवर व चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी सगरोळीतील नागरिकांनी केली आहे.