नांदेड : पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात गाजलेली आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी नीट (युजी) फेर प्रवेश परीक्षा रविवार दि.२१ जून रोजी दुपारी २ ते ५.१५ या कालावधीत होणार आहे. याआधी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आता ही फेरफरीक्षा ‘नीट’ आणि निर्विघ्नपणे पार पडावी, अशी तमाम परिक्षार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींची अपेक्षा आहे. याआधी आलेला कटू अनुभव लक्षात घेता परिक्षार्थ्यांची आणि पालकांची धाकधूक मात्र वाढल्याचे दिसून येत आहे.
या परिक्षेसाठी नांदेड जिल्ह्यात एकूण ४२ केंद्र असून त्यापैकी नांदेड शहरात २५ परीक्षा केंद्रे तसेच ग्रामीण भागात १७ परीक्षा केंद्र अशी एकूण ४२ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. नीट प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २१ जून रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता रिपोर्टींग करावे. स.११ ते १.३० ही वेळ परिक्षार्थीची तपासणीची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत परीक्षार्थी मार्फत कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब होऊ नये. यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली असून परीक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत पडताळणी केली जाणार आहे.
उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत मजकूर साहित्य, मुद्रित किंवा लिखित कागदाचे तुकडे, भूमिती पेन्सिल, बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राईव्ह, कॅल्क्युलेटर लाँग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तू परीक्षा केंद्रावर आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
याशिवाय वजनाने भारी असलेला पोशाख फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधित असून सांस्कृतिक व पारंपारिक पोशाखास तपासणी संदर्भाने परीक्षेच्या दिवशी सकाळी ११.३० वा. च्या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी केली जाणार आहे.
परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून प्रतिबंधीत करण्यात आलेल्या वस्तू परीक्षार्थीकडे आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल. नियमानुसार व कायद्यानुसार संबंधित उमेदवाराविरुध्द कारवाई करण्यात येईल.असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.