प्रातिनिधीक छायाचित्र pudhari photo
नांदेड

Nanded News | चढ्या दराने खत विक्रीप्रकरणी नायगावातील सात कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने सहा महिने स्थगित

चौकशीनंतर कारवाई; आणखी काही दुकाने कृषी विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : काही दिवसापूर्वी चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर अखेर कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नायगाव शहरातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभागाने संबंधित दुकान दारांना नोटीसा देऊन कार्यवाही केल्याने. कृषी व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कारवाई झालेल्या दुकानांमध्ये मातोश्री ऍग्रो एजन्सी, शिवकृपा कृषी सेवा केंद्र, गजानन कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ऍग्रो सर्विस सेंटर, हनुमान कृषी सेवा केंद्र, आणि दशरथ कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी शेतकरी पुत्र गजानन पवार यांनी नायगाव कृषी व्यापार पेठेत खताची चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. तसेच अचानक तपासणी मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागाने अनोळखी ग्राहकांच्या माध्यमातून खत खरेदीची गुप्त तपासणी केली. या तपासणीत वरील सात दुकानदारांकडून खताची जादा दराने विक्री होत असल्याचे उघड झाल्याची माहिती समोर आली.या वरून ही कार्यवाही झाली.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल तयार होण्यासाठी बरीच महिने लागल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. या कालावधीत संबंधितांमध्ये तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात रंगत होती. अखेर खरीप पिकांच्या हंगामात कृषी विभागाने कठोर भूमिका घेत कारवाई केल्याने इतर कृषी दुकानदारांचेही या प्रकरणाने धाबे दणाणले आहेत.शेतकऱ्यांनी आपल्याला चढ्या दराने का होईना खत मिळाला याचा आनंद न घेता इतराना ही खत मिळावा या भावनेने पुढे येऊन गैर कृत्य करणाऱ्या विरुद्ध तक्रार करावी असे आव्हान शेतकरी पुत्र गजानन पवार यांनी केली आहे.

दरम्यान, काही दुकानदारांचे परवाने तात्पुरते स्थगित झाल्याने इतर कृषी सेवा केंद्रधारकांना आनंद झाला तरी पुढच्याला ठेस लागली आपण तरी सुधारावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असले तरी, चढ्या दराने खत विक्री करणारे अजून काही दुकाने कृषी विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही कृषी केंद्रांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांची लूट थांबवा

खत, बियाणे आणि कृषी औषधांच्या विक्रीत अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. खरीप हंगामात शेतकरी अडचणीत असताना काही विक्रेते खताची चढ्या दराने विक्री करून नफा कमावत असल्याचा आरोप केला जात आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कायमस्वरूपी कठोर कारवाईची मागणीही जोर धरत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT