हदगाव :- तालुका मुख्यालय हदगाव येथे उभारण्यात आलेली तहसील कार्यालयाची नवी प्रशासकीय इमारत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आली असली, तरी या महत्त्वाच्या इमारतीत अद्यापही अग्निशमन (फायर सेफ्टी) यंत्रणा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.आग लागल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या पूर्वी हदगाव तहसील कार्यालयाची जुनी इमारत ही शहराच्या मध्यभागात इंग्रजकालीन व अतिशय जीर्ण अवस्थेत होती. ती पाडून तिथ आता उपविभागीय कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. नव्याने तहसिल कार्यालयची नवीन इमारत तामासा रोडच्या बाजूला असून त्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर पंचायत समितीचा परिसरात असतांना त्यामध्ये आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. या इमारतीत संजय गांधी निराधार योजना विभाग, निवडणूक विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग,रोजगार हमी योजना (रोहयो), चार नायब तहसीलदार कक्ष, तहसीलदार कक्ष, भूमी अभिलेख कार्यालय, बाल विकास विभाग, कोषागार विभाग आदी महत्त्वाचे विभाग एकाच छताखाली कार्यरत आहेत.
या इमारतीमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा उपलब्ध होण्याची सुविधा मिळाली असली,तरी रोज येथे ग्रामीण व शहरी भागातील शेकडो नागरिक विविध कामांसाठी येत असल्याने मोठी गर्दी होत असते. मात्र, इतक्या मोठ्या व गर्दीच्या ठिकाणी अग्निसुरक्षेची कोणतीही प्राथमिक साधने-जसे की फायर अलार्म, अग्निशामक यंत्रे किंवा आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था-उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. कर्मचारी व जागरूक नागरिकांच्या मते, अशा महत्त्वाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव हा गंभीर निष्काळजी पणाचा प्रकार असून, यामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे,आतापर्यंत कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडला नसल्याचेही बोलले जात आहे.
याबाबत तहसीलदार सय्यद उमर यांनी सांगितले की, सदर इमारत पंचायत समितीच्या आवारात येत असल्यामुळे तिच्या देखभाल व सुरक्षेची जबाबदारी पंचायत समितीकडे आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत तहसील कार्यालयात आवश्यक अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा उपकरणे व आपत्कालीन सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.