नांदेड : शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह अनावर झाल्यामुळे चार विद्यार्थी मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना नांदेड शहरात घडली.
अदनान फिरोज (10), अली इद्रीस (13), इरफान फिरोज (13) आणि अयान इब्राहिम बागवान (14) अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. यामुळे इस्लामपुरा भागावर शोककळा पसरली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ही मुले पोहण्यासाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरली होती. ती बुडाल्याची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना पाण्यातून बाहेर काढले व सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत चारही मुलांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नांदेड महापालिकेने विविध कामांसाठी शहरात जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. मात्र त्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.