नांदेड

Nanded News | पानगळ सुरू; जंगल, शिवार कोरडेपणाच्या छायेत!

वनविभागाने नागरिकांना जंगलात आग लावू नये, जळत्या काड्या किंवा बिडी, सिगारेटचे बुच जंगलात टाकू नयेत, असे आवाहन केले आहे

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड: हिवाळ्याच्या अखेरीस तापमानात होत असलेल्या वाढीचा परिणाम म्हणून परिसरातील जंगल व शिवारात पानगळ प्रकर्षाने दिसून येत आहे. रस्त्यालगतची जंगले, डोंगर उतार आणि शेतालगतचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आपली पाने गाळत असून संपूर्ण परिसर कोरडा व निस्तेज झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

झाडांखाली साचलेली कोरडी पाने, ओसाड वाटा आणि विरळ झालेली हिरवळ यामुळे वनपरिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पानगळ ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी यामुळे जंगलात आगीचा धोका वाढतो, अशी चिंता वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरड्या पानांमुळे किरकोळ ठिणगीनेही मोठी आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांच्या मते, पानगळ वाढल्याने जनावरांसाठी मिळणारा नैसर्गिक चारा कमी होत आहे. तर दुसरीकडे काही भागात पानगळ झालेल्या झाडांमुळे रस्त्यांवर पानांचे थर साचून वाहनचालकांसाठी घसरणीचा धोका निर्माण होत आहे.

वनविभागाने नागरिकांना जंगलात आग लावू नये, जळत्या काड्या किंवा बिडी, सिगारेटचे बुच जंगलात टाकू नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच ग्रामस्थांनी कोणतीही आग किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे. पानगळ ही ऋतूचक्रातील एक टप्पा असला तरी त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सामूहिक सजगता आणि काळजी आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT