Naigaon Panchayat Samiti administration issues Pudhari
नांदेड

Naigaon Panchayat Samiti | नायगाव पंचायत समितीत पुन्हा ‘प्रभारी राज’; ढवळे रजेवर, किनवटचे वैष्णव नव्या जबाबदारीवर

Nanded News | रखडली कामे, नाराज नागरिक आणि प्रशासनात प्रचंड गोंधळ; आता वैष्णव काय कमाल दाखवणार?

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Panchayat Samiti administration issues

नायगाव : नायगाव पंचायत समितीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली अदलाबदल, प्रभारी अधिकारी आणि गोंधळलेला कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कायमस्वरूपी गटविकास अधिकारी प्रविकुमार वानखेडे रजेवर गेले आणि त्यांच्या जागी नेमले गेलेले मुखेडचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे महिनाभरातच अर्जित रजेवर गेल्याने पंचायत समितीचा कारभार अक्षरशः अरिष्टात ढकलला गेला.

या गोंधळाला पूर्णविराम देण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ मेघना कावली यांनी तातडीचा निर्णय घेत किनवटचे सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांची नायगाव पंचायत समितीचे नवे प्रभारी बीडीओ म्हणून नियुक्ती केली आहे. वैष्णव लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.

८१ गावांची जबाबदारी, पण नेतृत्वाचा गोंधळ कायम!

नायगाव तालुक्यात तब्बल ८१ गावांचा कारभार पंचायत समितीमार्फत चालतो. रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, घरकुल, मग्रारोहयो, पायाभूत सुविधा अशी महत्त्वाची कामे याच कार्यालयातून राबवली जातात. मात्र, सक्षम नेतृत्वाचा अभाव, दर्जाहीन कामे, निधीअभावी ठप्प प्रकल्प, कागदपत्रांची प्रलंबित कामे, लाभार्थ्यांची आर्थिक कुबंबना यामुळे नायगाव पंचायत समितीचे नाव भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या ओघात पुन्हा-पुन्हा चर्चेत येऊ लागले आहे.

महिन्याला नवा प्रभारी… गावकऱ्यांचा बचाव कोण करणार?

दर महिन्याला नवा ‘प्रभारी’, नवे आदेश, नवा गोंधळ… त्यामुळे अनेक गावांची विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. रस्ते-पाणी योजनांवर धूळ पडली असून लाभार्थ्यांना मिळणारे घरकुल हप्ते आणि मग्रारोहयोचे लाभ महिनोंमहिने अडकून बसले आहेत. ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी असून निर्णयांसाठी नागरिकांना सतत प्रलंबित अवस्थेला सामोरे जावे लागत आहे.

वैष्णव समोर डोंगराएवढे आव्हान — खऱ्या अर्थाने ‘परीक्षा’ आता

नव्या प्रभारी पुरुषोत्तम वैष्णव यांच्यासमोर आजची प्रमुख आव्हाने—

रखडलेल्या रस्ते व पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावणे

घरकुल व मग्रारोहयोच्या लाभार्थ्यांचे थकलेले हफ्ते देणे

डीएसी तातडीने सुरु करून निधी वितरणाला वेग देणे

पंचायत समितीतील गैरव्यवस्थापनावर गंडांतर ओढणे

नागरिकांचा हरवलेला विश्वास परत मिळवणे

नायगाव तालुक्यात कारभार सुरळीत होईल का? हा मोठा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.

‘प्रभारी राज’ संपणार का? – पुढील काही दिवस निर्णायक!

पंचायत समितीत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून स्पष्ट आहे की स्थिर, अनुभवी आणि निर्णयक्षम अधिकारी नायगावला अत्यंत गरजेचे आहेत. वैष्णव यांच्या नियुक्तीनंतर कारभार रुळावर येतो का, विकासकामांना गती मिळते का, आणि लाभार्थ्यांचा आनंद परत मिळतो का – याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT