Naigaon Kharif Crops Crisis
नायगाव : पावसाने पाठ फिरवल्याने नायगाव तालुक्यात खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून, दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. सोयाबीन, कापूस यासह विविध पिके पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पिकांचे पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. ९) नायगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गावनिहाय पिकांचे पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
‘शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.