ज्ञानेश्वर कोकणे
खानापूर : देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागात सिलिंडर गॅस वितरणाबाबत शहर आणि गावांमधील कथित भेदभावाचा मुद्दा सध्या तापला आहे. ग्रामीण नागरिकांमध्ये वाढत्या असंतोषामुळे लोकप्रतिनिधींनीही या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्याच्या नियमानुसार, २५ शहरी ग्राहकांना दिवसांनंतर गॅस बुकिंग करता येते, तर ग्रामीण भागासाठी ही मर्यादा ४५ दिवस आहे. बुकिंगनंतरही ग्रामीण ग्राहकांना १५ ते २० दिवस अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
"सध्या शहरी भागात पहिले सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरे २५ दिवसांच्या अंतराने मिळते. मात्र, ग्रामीण भागात दुसऱ्या सिलिंडरसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहक कोणत्याही भौगोलिक भागात राहत असला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा समान निकषांनुसार मिळणे अपेक्षित आहे. हा स्पष्टपणे ग्राहक हक्कांचा भंग आहे."- विलास यालावार, सामाजिक कार्यकर्ते
गावांमध्ये संयुक्त कुटुंबे जास्त असल्याने एक सिलिंडर ४५ दिवस चालवणे अशक्य आहे. परिणामी, महागाई दराने खुल्या बाजारातून किंवा ब्लॅक मार्केटमधून गॅस खरेदी करावा लागतो. जळाऊ लाकडे मिळणेही कठीण आहे. दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागासाठी समान गॅस वितरण नियम लागू करण्यात यावे, पुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करावी, ब्लॅक मार्केटिंग आणि गैरवापरावर कडक कारवाई करण्यात यावी यासह गॅस वितरणातील भेदभावामुळे असंतोष वाढत असल्याचे दिसत आहे.